पराग ढोबळे, ता. २४ एप्रिल २०२४
अमरावतीमध्ये सभेच्या मैदानावरुन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा तसेच रवी राणांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर 23 आणि 24 एप्रिलला बच्चू कडू यांना सभेसाठी परवानगी मिळालेली होती. परंतु ऐनवेळी अमित शाहंची सभा होणार असल्यामुळे कडू यांना पोलिसांनी अडवलं. यावरुनच बच्चू कडू आक्रमक झाले होते. यावरुनच रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रवी राणा?
"देशाच्या गृहमंत्र्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता. बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसा आधीच अर्ज दिलेला होता. मात्र तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळून घेतले," असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
तसेच "बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो. ज्या थालीमध्ये खातो त्यात थालीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात," अशी टीकाही रवी राणा यांनी यावेळी केली.
दरम्यान, सायन्स कोर मैदानाच्या जागेवरुन हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर अखेर बच्चू कडू यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. "महायुतीकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून आम्ही माघार घेत असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.