'या'आधी कोरोना संकट संपवायचंय : मुख्यमंत्री  

'या'आधी कोरोना संकट संपवायचंय : मुख्यमंत्री  


मुंबई:   करोनाचे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवावं लागणार आहे, असे सांगत शिस्त आणखी कडक हवी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
लॉकडाऊन उठवायचा तर तो या क्षणीही उठवता येईल पण लॉकडाऊन उठवल्यास काय स्थिती उद्भवेल, याची कल्पना मला आहे. लॉकडाऊन उठवून मला महाराष्ट्राला संकटात ढकलायचे नाही. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. टीकेचा धनी झालो तरी मी लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.  मुंबईसह महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुंबईत रुग्णसंख्या वाढल्यास पुरेशी व्यवस्था असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वरळी एनएससी डोम, रेसकोर्स, गोरेगाव नेस्को, बीकेसी, एमएमआरडीए, सिडको, मुलूंड, दहिसर- मुंबई मेट्रेा, वरळी डेअरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची व्यवस्था करण्यात येत असून हॉस्पिटलबाहेर पहिल्यांदाच ऑक्सीजनसह आयसीयू बेडसची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात १४८४ कोविड केअर सेंटर्स, २ लाख ४८ हजार ६०० खाटांची उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले.

जनजीवन आपल्याला हळूहळू रूळावर आणायचे आहे. सहजतेने जगायला सुरुवात करायची आहे. यासाठी काही काळ घालवावा लागणार आहे. त्यामुळे जेवढी शिस्त आपण पाळू तेवढे लवकर आपण बंधनमुक्त होणार आहेत. म्हणूनच तुम्ही सरकारला सहकार्य करा, अशी माझी आपणास विनंती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक देशांत लॉकडाऊन घाईघाईत उठवण्यात आलं आणि नंतर स्थिती हाताबाहेर गेल्याने पुन्हा लॉकडाऊन करावं लागलं. 

लॉकडाऊन किती काळ राहणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही, जगाकडेही नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी तोडण्यात यश आले नसले तरी त्याची गती कमी करण्यात आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत. ही काळजी घेतली नसती तर महाराष्ट्रात आणि देशात किती अनर्थ झाला असता याचा विचारही करवत नाही. शैक्षणिक वर्ष, शाळा प्रवेश, ऑनलाइन शाळा यासारखे प्रश्न आहेतच. परंतु कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ दिले जाणार नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला कोरोनाचे संकट संपवायचे आहे, आपण सर्व मिळून हे संकट पूर्णपणे परतवून लावू.


मुंबई, ठाणे परिसरातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मूळगावी परतत आहेत. त्यांना मुख्यमत्र्यांनी गावी जाण्याची घाई करू नका अशी विनंती केली. थोडे दिवस वाट पाहा. करोना विषाणू घेऊन तुम्ही गावी जाऊ नका. तुमच्यामुळे तुमच्या तेथील कुटुंबाला संकटात ढकलू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. तेथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात येणार आहे, असे नमूद करताना रेड झोनमध्ये कोणत्याही स्थितीत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी यापुढेही व्हायला हवी, असे मुख्यमत्र्यांनी सांगितले. आपल्याला तसं करायचं नाही. एकदा सुरू केलेल्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला पावले टाकावी लागतील आणि संयम दाखवला तर निश्चितच आपण करोनाची ही साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 'घरात रहा, सुरक्षित रहा', असे आवाहन सरकारने केले होते. येत्या काळात 'घराबाहेर राहताना सावध राहा' असे सरकारचे तुम्हाला सांगणे असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
 

WebTittle :: I want to end the Corona crisis before this: CM


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com