अजय सोनवणे
येवला (नाशिक) : कांद्याचे सरासरी दर तीन हजार रुपयांच्या वर पोहचले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून गेल्या आठ दिवसात आठशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत लाल आणि उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी तीन ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र दोन आठवड्यांपूर्वी यात आठशे रुपयांची घसरण होऊन कांद्याचे दर २२०० रुपयांपर्यंत खाली घसरले होते. यात आता पुन्हा घसरण झाली आहे.
सरासरी १२०० रुपयांवर दर
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसात म्हणजे ६ मार्चच्या तुलनेत आठशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी दर १ हजार २५० रुपयांपर्यंत कोसळल्याने या दरातून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार क्विंटल कांद्याची आवक झालेली होती. या कांद्याला जास्तीत जास्त १५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये तर कमीतकमी २७६ रुपये इतका प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला.
शेतकरी चिंतेत
सध्या उन्हाळ कांदा काढणी होऊन बाजार समितीमध्ये त्याची आवक वाढली आहे. आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात घसरण होऊ लागली आहे. दरम्यान दररोज कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आठवडाभरात ८०० रुपयांनी दर घसरले असून आणखी आवक वाढल्यास आगामी काळात कांद्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.