Bharat Jadhav
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे व्रत २ ऑगस्ट रोजी पाळले जाईल. तसेच या संपूर्ण महिन्यात भाविक उपवास, पूजा, रुद्राभिषेक करतात. तर सात्त्विक आहाराचे सेवन करतात. श्रावण महिन्यात काही विशिष्ट पदार्थ खाण्याबाबत कडक निर्बंध आहेत. धार्मिक ग्रंथ आणि आयुर्वेदनुसार या महिन्यात दूध आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ उदा. कढी आणि रायता खाण्यास मनाई केली जाते
धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा तपश्चर्या, संयम आणि सात्त्विक जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. या काळात तामसिक (जड किंवा आळस निर्माण करणारे) आणि अति-समृद्ध अन्नपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अनेक परंपरांमध्ये दही, कढी आणि आंबट पदार्थ खाल्ली जात नाहीत. हलका आणि पचायला हलका आहार घेणे शुभ मानले जाते.श्रावण महिन्यात भगवान महादेवाला शीतलता देणारे आणि सात्त्विक (शुद्ध व आरोग्यदायी) पदार्थ अर्पण केले जातात.
आयुर्वेदानुसार, 'श्रावण' हा काळ पावसाळ्याच्या मध्यभागी येतो. या काळात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते आणि पचनशक्ती तुलनेने कमकुवत होते.
दह्याचा गुणधर्म जड मानला जातो आणि ते 'कफ' वाढवणारे असते. दह्याचे अतिसेवन केल्याने शरीरातील कफ वाढू शकतो, ज्यामुळे घशाचे विकार, सर्दी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याच कारणामुळे, आयुर्वेद पावसाळ्यात आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही दही न खाण्याचा सल्ला दिला जातो.
श्रावण महिन्यात दूध, कढी आणि दही यांसारख्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या पदार्थांच्या सेवनाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असतो.
श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस पडत असतो, ज्यामुळे नको असलेल्या ठिकाणी गवत उगवते, अशा गवतामध्ये अनेकदा विविध प्रकारचे कीटक आणि उपद्रवी जीव असतात. जेव्हा गाई-म्हशी चरण्यासाठी बाहेर जातात. तेव्हा त्या हे गवत खातात, ज्याचा परिणाम त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेवर होत असतो. अशा प्रकारचे दूध आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.
श्रावण महिन्यात ताजी फळे, पालेभाज्या, मुगाची डाळ, दुधी भोपळा, दोडका आणि पडवळ यांचा आहारात समावेश करणे, तसेच हलका आहार घेणे आणि तुपाचे सेवन मर्यादित ठेवणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.