Actor Death: मराठी संगीत रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायक-नट, नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसाद सावकार यांचे बुधवारी 17 जूनला निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पणजी येथील टोका करंजाळे परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांच्या पार्थिवावर गुरुवारी 8 जूनला सकाळी 10.30 वाजता पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कला, साहित्य, संगीत आणि नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला.
सांबप्रसाद रघुवीर सावकार हे त्यांचे पूर्ण नाव. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध सावकार घराण्यात त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक-नट होते. त्यामुळे बालपणापासूनच प्रसाद सावकार यांच्यावर संगीत आणि नाटकाचे संस्कार झाले. वडिलांकडूनच त्यांनी गायन आणि अभिनयाचे धडे घेतले.
बालकलाकार म्हणून ‘जिंजीहून सुटका’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर अनेक संगीत नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनय आणि गायनाची छाप उमटवली. ‘संशयकल्लोळ’ या नाटकात एकाच वेळी चार भूमिका साकारून त्यांनी विक्रमही केला होता. 1960 ते 1972 या काळात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनात प्रसाद सावकार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘तो राजहंस एक’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या.
‘जय गंगे भागिरथी’, ‘सावन घन गरजे’, ‘रतिहून सुंदर’, ‘भरे मनात सुंदरा’ आणि ‘नारायणा रमारमणा’ यांसारखी त्यांनी गायिलेली नाट्यपदे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा भरदार आवाज, शास्त्रीय संगीतावरील प्रभुत्व आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय बालगंधर्व सुवर्णपदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित सन्मान त्यांना प्राप्त झाले. प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीतील एक अजरामर स्वर कायमचा शांत झाला असला, तरी त्यांनी अजरामर केलेली नाट्यपदे, भूमिका आणि कलाविष्कार रसिकांच्या स्मरणात सदैव जिवंत राहतील.