पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा समावेश आहे. तसेच राज्यातील २९९ तालुक्यांमध्ये १०० टक्के पावसाचा दावाही विभागाने केला आहे.
कृषी विभागातील मुख्य सांख्यिक कार्यालयाच्या अहवालानुसार, अतिवृष्टी व पुरामुळे जुलै व ऑगस्टमध्ये एकूण चार लाख ९ हजार ५१६ हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. त्यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा समावेश आहे.
१ जून ते १६ ऑगस्ट या दरम्यान राज्यात सरासरी ७८२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यंत ८२८ मिलिमीटर म्हणजेच १०५ टक्के पाऊस झालेला आहे. २९९ तालुक्यांमध्ये मजबूत पाऊस आहे.
त्यातील १७७ तालुक्यांमध्ये तर १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस आहे. मात्र, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी भागात ५१ टक्के देखील पाऊस झालेला नाही. राज्यातील एकूण ५० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जादा पाऊस नसल्याने काही गावांमधील खरिपावर चिंतेचे सावट आहे.
राज्यात १४० लाख हेक्टरवर शेतकरी खरीप पेरा घेतात. सध्या १३४ लाखांपर्यंत पेरा झालेला आहे. काही भागांमध्ये अद्यापही भात लागवड सुरू आहे. सर्वसाधारणपणे भात आणि बाजरी आता फुटवे फुटण्याच्या स्थितीत तर काही भागात पोटरी अवस्थेत आहे. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आता वाढीच्या ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ या तीन संकटाबरोबरच राज्यात काही भागांमध्ये कीड व रोगाचेही संकट खरीप पिकांवर दिसते आहे. मात्र, अशा गावांची संख्या किती व कोणत्या गावांमध्ये कीड आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल लेव्हल) ओलांडत आहे याची माहिती सांख्यिकी विभागाने जाहीर केलेली नाही. मका व ज्वारीवर लष्करी अळी तर कापसावर गुलाबी बोंड अळी, पाने खाणारी अळी आणि रसशोषक कीड अशा तीन किडींचा हल्ला आहे.
मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्हे तहानलेले आहेत. अनेक भागांत ४० ते ५० टक्के पावसाची कमतरता आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीनमध्ये किमान २० ते ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे.
- कुलगुरू डॉ. अशोक ढवण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
पूरग्रस्तांसाठी जागतिक निधी?
कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थितीमध्ये जागतिक बॅंकेकडून मदत किंवा निधी मिळावा, यासाठी उद्या (शुक्रवारी) दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मागणी केली जाणार आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरातील पुरामध्ये झालेल्या नुकसानीचा आढवा घेतला, त्या वेळी ते बोलत होते.
परदेशी म्हणाले की, वातावरण बदलामुळे जो फरक पडत आहे, यावर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) दिल्लीत जागतिक तज्ज्ञांची बैठक होणार आहे. पूर, अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागांत बेघर झालेल्या पूरग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन करावे, यासाठी गावपातळीवर अधिकारी नियुक्त करून पूररेषेच्या बाहेर नवीन घरे बांधून द्यावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Web Title: Agriculture Loos by Flood in maharashtra
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.