नवी मुंबई - कोकण किनारपट्टीवर धडकलेले ‘क्यार’ वादळ आपल्यासोबत परतीच्या पावसालाही घेऊन पुढे सरकणार आहे. वादळाने काढता पाय घेताच राज्यात थंडीचे आगमन होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळी संपताच किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट होणार असून यंदा थंडीचा कडाकाही जास्त असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या उत्तर व मध्य भारतात थंडी दाखल झाली आहे. मात्र ‘क्यार’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अजूनही थंडी दाखल झालेली नाही. सध्या क्यार चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे असल्याने उत्तर दिशेने वाहणारे वारे नैऋत्य दिशेला सरकतील. परिणामी थंडी घेऊन येणारे ध्रुवीय वारे महाराष्ट्रात दाखल होतील. क्यार वादळ हवेतील बाष्प मोठ्या प्रमाणावर आपल्यासोबत खेचून आणणार असल्यामुळे गारठा निर्माण होऊन बाष्प जमिनीलगत येईल आणि धुक्यातही वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
आठवडाभरात चक्रीवादळे?
बंगालच्या उपसागरात नवीन चक्रवाताची परिस्थिती निर्माण होत आहे. पुढील दोन-तीन दिवसात याच्या तीव्रतेत वाढ होईल व संपूर्ण तमिळनाडू आणि केरळसह श्रीलंका प्रदेशाला मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसणार आहे. हा चक्रवात आणखी तीव्र होऊन याचे ‘१महा’ या चक्रीवादळात रूपांतर होईल. पुढे हिंद महासागरात आणखी एका चक्रवाताची शक्यता असल्याचे एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
क्यार चक्रीवादळाची दिशा लक्षात घेता दिवाळीत पावसापासून दिलासा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात अद्याप ढगाळ वातावरण आहे. दिवाळीच्या उत्तरार्धात थंडीचे आगमन होणार असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.
- श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र
Web Title: winter season after diwali
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.