औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे खरीप हातातून गेल्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची भिस्त ही आता रब्बी पिकांवर आहे. मात्र, महावितरणचे थकीत बिल भरा; नाहीतर वीज कट केली जाईल, या आदेशामुळे रब्बीचेही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही अशी चिन्हे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या महावितरणने शेतीचे वीज कनेक्शन कट करण्याची आणि डीपी बंद करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी वीज लागते त्याच वेळेस महावितरणने कारवाई सुरू केल्याने मोठे संकट ओढवले आहे.
हे देखील पहा -
यावर्षी खरीप हंगामात मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कापूस, सोयाबीन, मका या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती खरिपाचे पीक पडलं नसल्यामुळे राज्य सरकारकडून गेल्या पंधरवड्यापासून मदत देणे सुरू आहे. चारक भेटून शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी रब्बीतील गहू, हरभऱ्याची पेरणी केला आहे. त्या जमिनीला पाणी दिले नसल्याने भेगा पडल्या आहेत.
पिकांना आता पाणी देण्याची वेळ आल्यानंतर महावितरणने बिल भरण्याच्या सूचना केल्यामुळे रबी पिकांना पाणी कसे द्यायचे आणि वीज बिल भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतीचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.