मुंबई : भाजपचे विधानसभेतील गट नेते आणि हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मुंबईत राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, याची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंचं विधान धक्कादायक
शिवसेनेसोबत सध्या सुरू असलेल्या वादावर, फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'आमच्या पुढं सगळे पर्याय खुले आहेत, असं वक्तव्य आम्ही केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळं आमच्यासाठी हे विधान धक्कादायक होतं. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. पण, गेल्या पंधरा दिवसांत ज्या पद्धतीनं, ज्या भाषेत वक्तव्यं झाली. त्यामुळं परिस्थिती चिघळत गेली. माझ्या समोर अडीच वर्षांचा कधीही निर्णय झालेला नव्हता. या विषयावर एकदा बोलणी फिस्कटलं. त्यानंतर जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझ्या उपस्थितीत कधीच अडीच वर्षांचा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या चर्चेत विषय झाला असला तर मला माहिती नाही. मी या संदर्भात वरिष्ठांना विचारणा केली. पण, त्यांनीही या विषयावर कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं.'
धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही
राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना फडवणीस म्हणाले, 'राज्यपाल भगतसिंग भगतसिंग कोश्यारी यांना मी राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी मला राज्यात पुढील पर्याय निर्माण होऊपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याचं आवाहन केलं. या काळात मला कोणताही नवीन निर्णय घेता येणार नाही. धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. सरकार स्थापन होणं किंवा इतर कोणताही वैकल्पिक पर्याय निर्माण होईपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहे. केवळ राज्यपालांच्या आवाहनाला मान देऊन, मी हा निर्णय घेतला आहे.' असे सांगताना, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Title: devendra fadnavis will remain as acting cm of maharashtra
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.