मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांना आमदारकी मिळूच नये, ही आघाडीतल्याच काही लोकांचीच इच्छा-चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांना आमदारकी मिळूच नये, ही आघाडीतल्याच काही लोकांचीच इच्छा-चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांना आमदारकी मिळूच नये, त्यांना राजीनामा द्यावा लागला पाहिजे, अशी भावना भारतीय जनता पार्टीची नव्हे तर आघाही सरकारमधील काही असंतुष्टांची असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदारकीवरून सध्या राज्यात विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना पायउतार करून ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असून यात भाजपावर जाणीवपूर्वक टीका केली जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

''राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्‍न आहे. ते घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुणाची दादागिरी चालणार नाही. मात्र, राज्यपालांनी कसे वागावे, हे सांगणारी नवी लोकशाही राज्यात सुरू झाली आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय राज्यपाल घेतील. त्यावर अधिक बोलण्याची इच्छा नाही. मात्र, या विषयावरून भाजपावर टीका करणाऱ्या आघाडी सरकारमधील काही असंतुष्टांनाच मुख्यमंत्री ठाकरे यांचे सरकार पडावे, अशी तीव्र इच्छा आहे,"असे पाटील यांनी सांगितले. सत्तेशिवाय राहण्याची आम्हाला सवय आहे.आमचा प्रश्‍नच नाही. मात्र, सरकार पडावे, अशी इच्छा असणारे आघाडीतील काहीजण अशा प्रकारचा प्रचार करीत आहेत. ठाकरे सरकार पाडून ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे. त्यासाठीची ही सारी तयारी आहे. मात्र, भाजपाच्या नावाने जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

आघाडीतल्याच काहींनी ट्रोलर नेमले

ट्रोल करणाऱ्यांमध्ये सामान्य जनता नाही. आघाडी सरकारमधील काही घटकांनी भाडोत्री ट्रोलर नेमले आहेत. शंभर-शंभर लोकांची पगारी टीम त्यासाठी नेमण्यात आली आहे. कोण कुठून काय करतेय, याची कल्पना आहे. मात्र, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ नाही. मात्र, मी पाटील आहे. त्यामुळे अशा भाडोत्री ट्रोलला पाटील अजिबात घाबरत नसतात, असा टोला त्यांनी लगावला.

माझ्या ट्वीटमुळे मंत्री काम करायला लागले 

मी ट्विट केल्याने सतरा जिल्ह्यात पालकमंत्री काम करू लागले. चौदा जिल्ह्यात पालकमंत्री होते पण जात नव्हते. तीन जिल्ह्यात पालकमंत्री बदलले. आता सर्वजण त्यांच्या जिल्ह्यात काम करीत आहे, हे केवळ मी केलेल्या ट्विटमुळे सरकार जागे झाल्याने शक्य झाले, त्यामुळे, कोणी कितीही ट्रोल केले तरी आपण त्याला घाबरण्याचे कारण नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com