बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र असे तीर्थक्षेत्र कापूरबाव

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र असे तीर्थक्षेत्र कापूरबाव

जोतिबा डोंगरावरील उत्तर दरवाजा (कमान) परिसरात असणारे कर्पूरतीर्थ तथा कापूरबाव हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. पूर्वी या ठिकाणी अग्रस्ती ऋषी- लोपामुद्रा उभयतांनी या तीर्थाच्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून उपासना केली होती. या तीर्थाच्या काठावर असणारे कर्पूरेश्‍वर म्हणजे जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक होय. याचे मूळ नाव घृणेश्‍वर; परंतु या तीर्थाचा रंग लोखंडासारखा काळा होता, म्हणून त्याचे नाव कृष्णेश्‍वर असे रूढ झाले. पुढे द्वापारयुगात या तीर्थक्षेत्राचा रंग बदलून तो कापरासारखा पांढरा शुभ्र झाला. त्यास कर्पूरेश्‍वर असे नाव पडले. पुढे तेच कायम झाले. या लिंगाच्या नावावरून यास कर्पूरतीर्थ नाव मिळाले. Infomration about Kapurbaw in Kohlapur District

या तीर्थाच्या ठिकाणी गौतम मुनी, वसिष्ठ, कपिल मुनी, पाराशर यांसारख्या विद्वान ऋषींनी पूर्वी तपश्‍चर्या केल्याने या तीर्थास पावनतीर्थाचा दर्जा प्राप्त झाला. या तीर्थाचे महत्त्व इतर तीर्थांहून वेगळे आहे. याचे कारण असे, की दर बारा वर्षांनी अगस्तींचा विरह संपून त्यांचे मनोरथ पूर्ण करणारी अशी मनकर्णिका या तीर्थाच्या ठिकाणी प्रकट होते. त्या वेळी तीर्थातील पाणी पांढरे शुभ्र होते. या तीर्थातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पाण्याचे रंग ठराविक काळानुसार, ठराविक दिवसांनी बदलतात. कधी दातवणासारखा, कधी काळाभडक होतो. कधी इतके स्वच्छ पाणी असते, की पाण्याचा तळ आपल्या दृष्टीस पडतो. कधी हेच पाणी इतके हिरवट होते, की जणू हिरवा रंगच या पाण्यात आला आहे, असे वाटते. यामागे कायवैशिष्ट्य आहे याचे आज विज्ञानयुगात एक कोडेच आहे.

शारदीय नवरात्र उत्सवाच्या वेळी खंडेनवमीच्या दिवशी श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते या तीर्थावर आरती केली जाते. आरतीचे भाग्य अजूनही कोणत्याच तीर्थास नाही इतके पवित्र महत्त्व या तीर्थास आहे. असे असूनसुद्धा ग्रामस्थ व शासन यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या तीर्थाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. या तलावातील (तीर्थ) पाणी औषधी व पाचक आहे. येथील लोक पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी शेक (आमटी, पातळ भाजी) तयार करण्यासाठी यातील पाणी गेल्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी नेत. आता याची दुरवस्था झाल्याने पाण्याचा वापर होत नाही. Infomration about Kapurbaw in Kohlapur District

पावसाळ्यात महिला फक्‍त येथे कपडे धुतात. या तीर्थास लागून पूर्वी एक मोठी विहीर होती. त्या विहिरीच्या पाण्याचा वापर ग्रामस्थ पिण्यासाठी करत; परंतु कालांतराने या विहिरीभोवती पूर्ण तीर्थसभोवती (तलाव) संरक्षक कठडे बांधले होते. पावसाने कठडे पडून सध्या विहीर भुईसपाट झाली आहे. अडीअडचणीच्या वेळी हा पाण्याचा आधारही ग्रामस्थांना संपुष्टात आला आहे. या तीर्थाच्या परिसरात सध्या भरपूर प्रमाणात घरे झाल्याने व तीर्थाच्या बाजूस असणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रचंड अशा मोरी आज बुजून गेल्यामुळे पावसाळ्यामध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही. 

पाण्याचा दाब वाढल्यामुळे संपूर्ण संरक्षक भिंती कमकुवत झाल्या असून, काही ठिकाणच्या भिंती या तीर्थामध्ये पडल्या आहेत. अजूनही संरक्षक भिंतीची पडझड सुरू आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. गावातील काही जाणकार मंडळी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, शासन यांनी या तीर्थाचे महत्त्व लक्षात घेऊन याची देखभाल व दुरुस्ती करणे आज फार गरजेचे आहे. भाविकांच्या नजरेपासून दूर असणाऱ्या या तीर्थक्षेत्राचा शासनाने व संबंधितांनी विकास घडवून आणणे महत्त्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com