भारत-चीन तणावावरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारला टोला

भारत-चीन तणावावरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारला टोला

पंडित नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल असा टोला सामना संपादकीयातून लगावण्यात आलाय. मोदी म्हणतात डिवचल्यास उत्तर देऊ, 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय? असा सवालही यातून करण्यात आलाय.

नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम परिस्थितीत होते.साधे कॅन्वॉसचे बूट, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हाची स्थिती होती. आज सर्वकाही आहे. पण तरिही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले असं शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटलंय.

भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलीय.  आज ही बैठक पार पडणार आहे. चीनबरोबर सुरू असलेल्या वादावर सर्वपक्षीय नेत्यांची काय मतं आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलीय. संध्याकाळी पाच वाजता सर्व पक्षांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी होणार आहेत. या विषयावर विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची सतत मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय. लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहचलाय. हा तणाव मुत्सद्देगिरीच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 

दरम्यान, भारतात लोकप्रिय असलेले तब्बल 52 चायनीज ऍप धोकादायक असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलाय. यामध्ये TikTok, UC Browser, एक्सेंडर आणि शेअर ईट या ऍपचाही समावेश आहे. सरकारनं हे ऍप ब्लॉक करावेत किंवा या अॅप्सचा वापर करणाऱ्यांना हे ऍप न वापरण्याचा सल्ला द्यावा असंही गुप्तचर संस्थानी सांगितल्याचं समजतंय. या ऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याची भीती गुप्तचर संस्थांनी व्यक्त केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com