मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. 'हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा', असे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले. ते मुंबईत शिवसेनेने (Shivsena) आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. ( Aditya Thackeray News In Marathi )
शिवसेनेने पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विरोधकांसहित बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, 'मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. त्यासाठी राजकीय पक्षांचे राजकारण सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांचे पक्षावरील प्रेम दिसून येत आहे. आता शिवसेनेतून घाण निघून गेली आहे. आता जे काही होणार ते चांगले होणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, 'ज्या दिवशी प्लोअर टेस्ट होईल, त्या दिवशी त्यांची हिंमत बघू. विमानतळावरून विधानभवनाकडे जाणारे मार्ग आपले आहेत. ही मुंबई, हा आपला महाराष्ट्र आहे, तो कोणाचा होऊ देणार नाही, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला.
'हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. दगाबाजांना आता महाराष्ट्रात जागा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीने बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचे महिला आघाडीने ठरवले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.