विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केलाय, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सोहळा राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रदान जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद करांडे उपस्थित होते.
सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. आजचा क्षण हा केवळ या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापक, पालक आणि ज्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा क्षण आहे, असे सांगून राज्यपाल बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केलाय. भारताच्या सुवर्ण युगाच्या काळात आजची युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे. विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी पुढील १० वर्षांत विद्यापीठाला भारतातील पहिल्या १० विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त होईल यासाठी लक्ष्य निश्चित करावे.
विद्यापीठ प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करावी. गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, कौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही राज्यपाल बैस यांनी यावेळी केल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.