ज्ञानेश्वर हिंगोलीकर
पुणे : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विश्रांतवाडी भागातील आशीर्वाद पॅलेसमध्ये कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 'भाजपा (BJP) ही फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वांत मोठी पार्टी आहे. त्यामुळे तुमची मोठी जबाबदारी आहे. आज ठामपणे म्हणू शकतो की, गेल्या ५ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi ) कामामुळे भारत आर्थिक श्रेणीत अग्रेसर आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
हे देखील पाहा -
पुण्यातील विश्रांतवाडी भागातील आशीर्वाद पॅलेसमधील कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले, 'भाजपा ही फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वांत मोठी पार्टी आहे. त्यामुळे तुमची मोठी जबाबदारी आहे.आपण राजकारण केवळ सरकार बनवण्यासाठी करत नाही, तर आपण राजकारण हे देश बनवण्यासाठी करतो. आज ठामपणे म्हणू शकतो की, गेल्या ५ वर्षात मोदींच्या कामामुळे भारत आर्थिक श्रेणीत अग्रेसर आहे. प्रत्येकाला घर, घरात शौचालय, घरात नळ, नळात पाणी याची सरकार पूर्तता करत आहे. तसेच लोकांची जनधन खाती उघडली आहेत. आपण भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळं भारताला आता लोक सन्मानाच्या नजरेने पाहतात. भ्रष्टाचाराचा आजार हा भाषण देऊन संपवता येत नाही, त्यासाठी व्यवस्थेत बदल करावे लागतात. हे बदल भाजप सरकारने केले आहेत. त्यामुळेच दिल्लीतील बँकेत जमा केलेले 100 रुपये गावातल्या व्यक्तीच्या खात्यावर पोहोचतात'
कोरोना काळात भारतीय सैनिकांनी केलेल्याचे कामाचेही राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. राजनाथ सिंह म्हणाले, 'कोरोनाकाळात तिन्ही दलातील सैनिकांनी काम केले. रशिया- युक्रेन युद्ध काळातही भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोदींच्या पुढाकाराने सैनिकांनी महत्वाचे काम केले. आत्मनिर्भर भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे नजर वाकडी करून बघत नाही. कोणाला त्रास देणार नाही, परंतु कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा देखील राजनाथ सिंह यांनी सभेत बोलताना दिला.
राजनाथ सिंह यांचे देशातील महागाईवर भाष्य
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी देशातील महागाईवर देखील भाष्य केलं आहे.'भाजप सरकारने कोरोनाकाळात अर्थव्यवस्था कोसळू दिली नाही. त्यामुळं महागाईवर नियंत्रण आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे, त्याचा परिणाम हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारच. त्यामुळं देशात महागाई वाढली आहे. अमेरिका हा तर जगातील सर्वाधिक श्रीमंत देश आहे. तिथंही प्रचंड महागाई वाढली आहे. त्या मानाने भारतातील परिस्थिती चांगली आहे,त्यामुळं कार्यकर्त्यांनो हिंमत ठेवा, असा सल्ला देखील राजनाथ सिंह यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पुढे राजनाथ सिंह म्हणाले, सध्या महागाई वाढल्याची चर्चा आहे. मात्र, कोरोना काळात तर अर्थ व्यवस्था ठप्प होती, पण त्या काळात केंद्र सरकारन् अर्थव्यवस्थेला सावरले. युक्रेनयुद्धामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अमेरिकेत गेल्या ४० वर्षात जेवढी महागाई नव्हती, आता तेवढी महागाई वाढली आहे. त्या तुलनेने भारतात स्थिती ठिक आहे, असे मत राजनाथ सिंह यांनी महागाईवर बोलताना व्यक्त केले.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.