मुंबई : शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, तलाठी,चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांकडून ठाणे ते मुंबई असा पायी पेन्शन मार्च काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची DCPS/NPS योजना सुरू केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यामध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण आहे. मात्र मागील 16 वर्षातील या DCPS / NPS योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीवेतन मिळतांना दिसत नाही असा आरोप कर्मचारी संघटना करत आहेत.
मागील 16 वर्षात मयत किंवा सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे निंदनीय आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे अशी मागणी करत 21 डिसेंबरला नाशिक -मुंबई महामार्गावरील पडघा येथील विठ्ठल रुखमाई मंदिरापासून विधानभवन असा हा पायी पेन्शन मार्च काढण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे अश्यात सत्ताधारी आणि विरोधक यांना जुनी पेन्शन योजनेची आठवण करून देण्यासाठी हा पायी पेन्शन मार्च काढण्याचा निर्णय संघटनांनी घेतल्याची प्रतिक्रिया जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती चे संयोजक विनोद लुटे यांनी दिली आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.