मुंबई : बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. सीमाभागातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत आता भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमावादाला वेगळं रुप दिलं जात आहे. बेळगावात आज जे घडलं ते निषेधार्य आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं.
सीमाभागात जे घडतंय ते चुकीचं आहे. त्यामुळे आता सीमाभागात जे घडतंय त्याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे. कर्नाटकच्य मुख्यमंत्र्यांनी आधी जत संदर्भात भूमिका मांडली, अक्कलकोट संदर्भात भूमिका मांडली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी भाषा केली त्यामुळे सीमा भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. (Maharashtra News)
परिस्थिती चिघळली तर कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदारी असतील
सीमा भागातील स्थिती चिंताजनक आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत आणि परिस्थिती आणखी बिघडेल. महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र संयमालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे पुढील परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. (Maharashtra-Karnataka Border Dispute)
कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांडकून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. सीमावादाला सुरुवात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं.
तर मला सीमाभागात जावं लागेल
केंद्राचा दबावाचा प्रश्न नाही, दोन्ही राज्यात त्यांचे सरकार आहेत. आपली माणसं संयमाची भूमिका घेत आहेत. या अगोदर तिकडचे मुख्यमंत्री अशी भूमिका घेत नव्हते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे मला फोन आले होते.
यावेळेस राज्य सरकार काय करतंय हे पाहणं महत्वाचे आहे. जर परिस्थिती अशीच कायम सुरु राहिली तर माझ्यासह इतर लोकांना तिथे धीर द्यायला जावं लागेल. लोकांचा उद्रेक वाढू शकतो, तो उद्रेक वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत, असंही शरद पवारांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.