रश्मी पुराणिक
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या (Hostel) नामकरणाबाबत मोठा वाद निर्माण झालेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार या वसतिगृहाला स्वातंत्र्यावीर सावरकरांचं (Swatantryaveer Savarkar) नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभाविपच्या मागणीला यश आल्याचं बोललं जातंय. या निर्णयाबाबत छात्रभारतीने या संघटनेने निर्णयाचा विरोध केला आहे. (Mumbai University Latest News)
हे देखील पाहा -
मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. नव्याने बांधण्यात आलेल्या या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच नाव देण्यात यावं अशी सूचना राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केली होती, तर या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली होती. आता अखेर याबाबतचा निर्णय आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावंत्र्यावीर सावरकरांचं नाव देण्यात आलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या सुचनेनुसार हे नाव देण्यात आलं आहे.
आज झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही पूजनीय असल्याची प्रतिक्रिया युवासेना सिनेट सदस्यांनी दिली आहे. राज्यपालांनी केलेल्या सूचनेला प्राचार्य भांबरे, सिनेट सदस्य निल हेलेकर, प्राध्यापक गरजे यांनी यांनी पाठींबा दिला. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं हे वसतिगृह सहा मजल्यांचं आहे. पश्चिम मुंबईतील सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये हे वसतिगृह बांधण्यात आलं आहे.
याबाबत छात्रभारती संघटनेने परिपत्रक काढत या निर्णयाचा निषेध केला आहे. या परिपत्रकात म्हटलं की, सावरकर यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतीगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे, अशी संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे.
8 जुलै 2022 ला कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यपाल आपल्या भाषणादरम्यान कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे पाहून म्हणाले, "वीर सावरकर यांनी १८५७ चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम लिहिला. मला वाटतं कुलगुरू त्यांच्या नावाला विद्यापीठात कुठेतरी स्थान देतील." राज्यपालांच्या या भाषणावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता, तर या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली होती. यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचं नाव देण्यात आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.