रश्मी पुराणिक
मुंबई: बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, असे ट्विट शिंदे यांनी केले होते. तसेच आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. एकनाथ शिंदेंच्या या ट्विटनंतर राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण मिळणार असं जाहीर केलं आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील वाचा -
याबाबत स्पष्टीकरण देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, सुरक्षा ही केवळ आमदारांना असते त्यांच्या कुटुंबियांना नसते. पण आमदार हेच राज्याबाहेर गेल्याने त्यांच्या सुरक्षेत असेलेल पोलीस हे आपल्या पूर्वपदावर गेले आहेत. आमदार खासदार यांना जी सुरक्षा दिली जाते ती स्थानिक पातळीवर असते. मात्र, तरीही आता बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, नियमाप्रमाणे विधानसभा सदस्य इथे नसतील तर पोलीस हे त्यांची सुरक्षा त्यांच्या घरी जाऊन करणार नाही, त्यांच्या घरी बसणार नाही, ते आपलं काम करतात. बाकी पोलीस दल अलर्ट आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जातेय असंही वळसे पाटील म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आज, शनिवारी ट्विट करून खळबळ उडवून दिली. 'राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे,' असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि आहे, याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.
एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपानंतर काही वेळातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदेंचा दावा खोडू काढला. गृहमंत्री म्हणाले की, "राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत." असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By - Akshay Baisane
हे देखील पाहा -
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.