मुंबई : नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल (Nupur Sharma and Naveen Jindal) यांचा विषय आता भारताचा अंतर्गत मामला राहिला नसून हा विषय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहे . विविध धर्मांचे जे प्रेषित वा महात्मा आहेत त्यांच्याबद्दल परदेशातील विविध धर्मिय जनता व त्यांची सरकारे संवेदनशील आहेत . त्यामुळेच मोहम्मद पैगंबरांबद्दलच्या नूपुर शर्मांच्या अपमानकारक वक्तव्याबद्दल मध्य पूर्वेतील देशांनी नाराजी व्यक्त केली असून युरोपीय देशांमधेही नाराजी असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे.
जगातील अनेक देशात कोट्यावधी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. तिथे त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कुवेतने इशारा दिला आहे की, अशी प्रतिक्रिया दिल्यास देशा बाहेर काढू शकतो. आज अंदाजे ९० लाख भारतीय गल्फमधे रहातात आणि भारताला परदेशातून येणाऱ्या एकुण पैशापैकी ५५% गल्फ मधून येतो. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या असंवेदनशील भूमिकांमुळे देशाला गंभीर आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय नागरिक या प्रश्नावर भाजपच्या भूमिकेशी सहमत नाहीत. भाजपने नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना निलंबित केले असले तरी भाजपच्या (BJP) केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेले दिल्ली पोलिस इतर राज्यातील पोलिसांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे देशातील शांतता व सुव्यवस्थेबाबत धोक्याची परिस्थिती असल्याचंही आंबेडकर म्हणाले.
शिवाय भाजपच्या या संवेदनाशून्य धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा गैरफायदा खलिस्तान वाद्यांच्या संघटना घेत आहेत. पाकिस्तानातील ISI असेल मध्य पूर्वेतील ISISI असेल अशा इस्लामी आतंकवाद्यांशी हातमिळवणी करुन वचपा काढण्याची व भारतात दहशतवादी कारवाया करण्याची भाषा बोलत आहेत. भारतीय मुसलमान आजपर्यंत इस्लामिक दहशतवादी संघटनांना बळी पडला नाही. ९९ टक्के मुसलमान भारताशी प्रामाणिक राहिला. या मुस्लीमाला आज अवमानित केल्याची भावना आहे.
केंद्र शासनाला या प्रश्नावर संवेदनशील करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने अमन मोर्चा आयोजित केला आहे. शरद पवारांचा अपमान करणाऱ्या केतकी चितळेला ताबडतोब अटक करून जी संवेदनशीलता मविआ सरकारने दाखवली ती संवेदनशीलता जामिनपात्र नसलेले वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करून केंद्र सरकार का दाखवत नाही हा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आवाहन करत आहे की व्यापक जनहिताच्या भूमिकेतून अमन मोर्चामध्ये त्यांनी सहभागी व्हावे. आम्ही या पक्षाना रितसर पत्र देखील पाठविणार असल्याचंही आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.