'मविआ' सरकारने २ दिवसात घेतलेले 'ते' १६० निर्णय रद्द करा; भाजप नेत्याचे राज्यपालांना पत्र

'राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर मागील २ दिवसांपासून अंधाधुंद घेतलेले निर्णय मागे घ्यावे.'
BJP Leader's letter to the Governor
BJP Leader's letter to the GovernorSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी गेल्या दोन दिवसात राज्य सरकारने घेतलेले जवळपास १६० निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले GR आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत आपण राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) पत्र पाठवलं असल्याचं दरेकर यांनी सांगितलं आहे.

राज्यपालांना उद्देशून लिहलेल्या पत्रात दरेकरांनी (Pravin Darekar) लिहलं आहे की, कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची. गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत:राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.

अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (GR) काढून निर्णयांचा सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. १६० च्या वर शासन आदेश ४८ तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे.

हे देखील पाहा -

अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार (MVA Goverment) कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.

महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती असं पत्र दरेकरांनी राज्यपालांना लिहलं आहे. त्यामुळे राज्यपाल आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार का हे पहावं लागणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com