संगमनेर : असमानी संकट, महावितरणची लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीतून मार्ग काढत शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने शेती करत आहे. अहमदनरच्या संगमनेर तालुक्यातील पठारभागातील शेतकऱ्यांची स्थिती देखील फारशी वेगळी नाही. या भागातील शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले आहे. कांद्याची काढणी देखील आता पूर्ण होत आली आहे. परंतु बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना रडवणारा कांदा आता पठारभागातील शेतकऱ्यांनाही रडवत आहे. कांद्याल्या मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांवर नैराश्याची वेळ आली आहे. कांदा शेतकऱ्यांसाठी वांदा बनल्याचे चित्र संगमनेरच्या पठारभागात पाहायला मिळत आहे. (Onion Price News in Marathi)
हे देखील पाहा -
पठारभागातील शेतकऱ्यांना कांद्याने अक्षरश: रडवायला सुरुवात केली आहे. हजारो एकरावरील डाळींब पीक तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव आल्याने पीक काढून टाकण्याची वेळ पठारभागातील शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून कांद्याचे पीक घेतले होते. या शेतकऱ्यांनी कांदा पीकाची हजारो हेक्टरवर लागवड केली होती. गेल्या दोन वर्षापासून कोरोना आणि लॉकडाउनमुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. त्या संकटातून उभारी घेत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. त्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळावी, एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा होती. खते, औषधे, मशागत, मजुरी या सर्वांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन कांद्याची लागवड केली. परंतु कांद्याला पाच ते सहा रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
दरम्यान, कांद्याला चांगला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे संगमनेरच्या पठारभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.