भंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board) बुधवारी बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. अशातच बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रासोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या युवकाचा वैनगंगा नदीत पात्रात बुड़ुन मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी सायंकाळी भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माड़गी रेल्वे पुलाखाली घडली. निखील महादेव बालगोटे (वय 17) राहणार गुरूनानक नगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. (Bhandara Latest Marathi News)
मृत निखिलला बारावीच्या परीक्षेत 57 टक्के गुण मिळाले होते. आपण पास झालो याचा आनंद साजरा करण्यासाठी निखील आपल्या तीन मित्रांसोबत माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. दरम्यान त्यांना पाण्याचा मोह आल्याने त्यांनी पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. निखील हा सुद्धा हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. आणि तो नदीपात्रात बुडाला.
दरम्यान, निखील बुडत असल्याचं लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी तातडीने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेची माहिती तुमसर पोलिसाला मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक निखील याचा शोध नदीपात्रात सुरु केला.
सुमारे एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर निखीलचा मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत पास झालेला निखील आयुष्याच्या परीक्षेत हरल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.