राजकुमार देशमुख
सोलापूर - यंदाचा गुढीपाडवा हा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात साजरा होत आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अकलूजच्या (Akluj) मोहनराव देशमुख यांनी स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले आहे. गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्य लढ्याच्या विजयाचे स्मरण देशमुख कुटुंबियांची गुढी करून देत आहे. उंच बांबूला धैर्य आणि शक्तीचे प्रतीक असणारा केशरी रंग, देशाच्या शुद्धतेचे, शांतीचे आणि मानवतेचे प्रतीक मानला जाणारा पांढरा रंग आणि सुपीक भूमीशी नाते सांगणारा हिरवा रंग अशी तिरंगी गुढी गगनाची शोभा वाढवत आहे.
हे देखील पहा -
या निमित्ताने नव्या क्षितिजाकडे झेप घेण्यासाठी, गेल्या दोन वर्षांपासून आवळलेला साथीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी स्वातंत्र्याचा विजय प्रेरणा देतो. संकटावर मात करून उभं राहिल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं जीवनाचा सामना करण्याची शक्ती देतो. म्हणूनच हा गुढीपाडवा आपल्या सर्वांसाठी अनोखा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवसंवत्सराची सुरुवात. उंच बांबूला नवीन वस्त्र, तांब्याचा, चांदीचा कलश, साखरेची माळ आणि सोबत न चुकता कडुनिंबाचा डहाळा लावून उभारलेली गुढी म्हणजे अभिमानाचं प्रतीक.
पाडव्याला अवघ्या महाराष्ट्रात कुठंही जा, गगनाची शोभा वाढवणाऱ्या या गुढ्या घराघरांवर दिसणारच. पण मुलुखाप्रमाणं गुढ्यांचे रंग बदलतात, सण साजरा करण्याच्या परंपरा बदलतात. अर्थात या विविधतेतही आहे अनोखी एकता, समता आणि बंधुता. हीच राष्ट्रीयत्वाची भावना घेऊन उभा केलेली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची गुढी यंदाच्या गुढीपाडव्याची शोभा वाढवताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.