औरंगाबाद : भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या विरोधात केलेलं अपील फेटाळले आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) मेहबूब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, मेहबूब शेख यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीने जबाबावरून घुमजाव केला.
या प्रकरानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात ५० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याच प्रकरणात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा दावा फेटाळला. कोर्टाने दावा फेटाळल्यामुळे चित्रा वाघ यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मेहबूब इब्राहिम शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ वर्षीय उच्चशिक्षित पीडित तरुणीने ही फिर्याद नोंदविली होती. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख याने कारमध्येच अत्याचार केल्याचा आरोप केला होता. प्रतिकारही केल्यानंतरही त्याने तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या विरोधात वक्तव्ये केले होते. त्यानंतर पीडित तरुणीने आरोपावरून घुमजाव केला. पीडित तरुणीने जबाबावरून घुमजाव केल्यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात ५० लाख रुपयांचा दावा दाखल केला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.