नागपूर - वीज केंद्राची राख पुन्हा एकदा कन्हान नदीत आल्याने नागपूरकरांना राखयुक्त पाणी प्यावं लागतं आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव ॲशपॅाण्डमधून राख लिकेज होत आहे. ॲश पॅाण्डमधून लिकेज झालेली राख थेट कन्हान नदीत येत आहे. त्यामुळे याचा त्रास नागपूरकरांना (Nagpur) सहन करावा लागत आहे.
कन्हान नदीत राख आल्याने नागपूरच्या काही भागात राखयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कन्हान परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे तलावातून राखेची गळती झाल्याची शक्यता आहे. ॲश पॅाण्डच्या ओव्हरफ्लो पॅाइंटवरुन राख आधी कोलारा नदीत आणि नंतर कन्हान नदीत मिसळली.
कन्हान जलशुद्धीकरण विहीरीजवळ देखील राख आली आहे. खापरखेडा वीज केंद्रातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हजारो लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीदेखील पावसाळ्यात कन्हान नदीपात्रात राख पसरली होती.
राखमिश्रित पाण्याला शुद्ध करणे अशक्य आहे कारण ते पाणी विषारी असते. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ वॉटर पंपाला पूर्णत: स्वच्छ करणे अशक्य आहे. जेणेकरून त्यात कुठलीही राख शिल्लक राहू नये.
या ॲश पॅाण्ड आधीच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न भीषण आहे. कारण ही ॲश श्वसनाच्या माध्यमातून शरीरात जाते. यामुळं या परिसरात आजार वाढले आहेत. जमिनीवर ही ॲश हवेच्या माध्यमातून पोहचत असल्यानं जमीन बंजर झाली आहे. सुपीक जमीन नापीक झाल्यानं परिसरातील गावकरी चांगलेच संतप्त आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.