नाराजी नाट्यामुळे सामंत यांना रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची हुलकावणीच

नाराजी नाट्यामुळे सामंत यांना रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची हुलकावणीच

चिपळूण : ठाकरे सरकारमधील मंत्रीपदावरून जिल्ह्यात गाजलेल्या नाराजी नाट्यामुळे शिक्षणमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे. सामंत यांना रत्नागिरीऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री करत ठाकरेंनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार याची खात्री झाल्यानंतर जिल्ह्यात मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू होती. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, असे महाविकास आघाडीचे सूत्र ठरले होते. मंत्रीपदासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यात चुरस होती. विधीमंडळातील अनुभवामुळे भास्कर जाधव मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला कमी मंत्रीपदे आली. त्यामुळे जाधव यांच्यासह राजन साळवींचे नाव मागे पडले. 

त्यामुळे भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालकमंत्रीपदाची उत्सुकता होती. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. जिल्ह्याला येणारा निधी खर्च करण्याचे तसेच आमदार, खासदारांनी शिफारस केलेली कामे मंजूर करण्याचे अधिकारही पालकमंत्र्यांना असतात. शिवसेनेच्या उमेदवारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारासमोरच निवडणुका लढवल्या होत्या. 

सामंत पूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे प्रेम उफाळून आले. त्यांना पालकमंत्रीपद मिळाले असते तर नाराज गट सतत सक्रिय राहिला असता. यातून वाद उफाळून त्याचे पडसाद महाविकास आघाडीच्या वाटचालीवर झाले असते. हा वाद होऊ नये म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. यामुळे अॅड. परब यांच्या माध्यमातून शिवसेनेने मुंबईतील नेत्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवली आहे.

अॅड. अनिल परब हे अभ्यासू आणि संघटनकौशल्य असलेले शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत आहे. अॅड. परब जिल्ह्याच्या विकासाला चालना देतील. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही ते समान न्याय देतील - प्रतापराव शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष, चिपळूण

Web Title : Uday Samant missed chance to become guardian minister

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com