बारामती - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, देश शहीद जवानांच्या पाठीशी उभा आहे. मात्र देशाचे संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला अपयश आल्याचे निदर्शक आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
आज बारामती मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणुकीपूर्वी 56 इंच छाती असलेले नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारवर असे हल्ले झाल्यानंतर तुम्ही लव्ह लेटर पाठवता अशी टीका करायचे. आता मात्र या हल्ल्याने मोदी यांची कार्यक्षमता सिद्ध झाल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
ही वेळ राजकारण करण्याची नाही. संपूर्ण देश याप्रसंगी वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही याच्यावर काही राजकीय भाष्य करू इच्छित नाही मात्र नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला दहशतवादी हल्ले थोपविण्यात अपयश आलं हे मात्र यातून पुन्हा एकदा उघड झाला आहे असे पवार म्हणाले.
या हल्ल्यामध्ये शेजारच्या देशाने दहशतवाद्यांना मदत केली हे उघडपणे दिसते आहे. दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आलेले आहेत आणि ते प्रशिक्षित होते. याचा अर्थ त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हे उघड आहे संपूर्ण माहिती घेऊन पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला घडविण्यात आला आहे. असे एकूण दिसते त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला हा हल्ला थोपविण्यात अपयश आले असे पवार यांनी सांगितले.
मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असत. मी मात्र आता राजीनाम्याची मागणी करणार नाही पण याबाबत सरकारचे अपयश या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले असे पवार म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.