'आपल्याला अंबानीची मुलगी आवडली, आई-बाबासुध्दा लग्नाला तयार आहेत. कुणाकडे नंबर आहे का त्यांचा, मला लग्न करायचे आहे.' अशा प्रकारे सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध होत आहे.
सोशल मीडिया हे नेहमीच दुधारी शस्त्र राहिले आहे. ज्या सोशल मीडियाच्या आधारावर स्वतःचे, स्वतःच्या पक्षाचे 'ब्रॅँडींग' भाजपाने केले. तेच आता त्यांच्या पथ्यावर पडू लागले आहे. मुंबई येथे एका गोविंदा पथकाच्या कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात भाजप आमदार राम कदम यांनी तरूणाईला इशारा करित जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. विरोधी पक्षांनी याचे जोरदार भांडवल केले असून, प्रत्येक ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला.
मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांला कधी काळी याच पक्षाने जणू 'ब्रॅंड अॅम्बिसीडर बनविले होते. रामनामाच्या आधारावरच उत्तर भारतातील मोठ्या निवडणूकांमध्ये यश मिळविले. मात्र, आमदार राम कदम यांनी केलेल्या घृणास्पद वक्तव्याने 'राम' नामाची मार्यादाही घालवल्याची चर्चा सोशल मीडियावर धूम करीत आहे.
एकीकडे देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. दहीहंडी उत्सवामध्ये कदम यांनी दहीहंडी उत्सवामध्ये येणाऱ्या मुलींना उद्देशून घृणास्पद वक्तव्य केल्यामुळे बेटी बचाओ, बेटी पढाओनंतर आता भाजप नेते बेटी भगाओ असा नवीन कार्यक्रम पक्षाने हाती घेतला का? असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांना आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे खुलं दालन आहे. याच माध्यामातून गोविंदा पथक कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या व्यासपीठावर गेले असल्याने त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.