पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात पाच लाख टनांनी घट होणार आहे.
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपग्रहांच्या मदतीने छायाचित्रे घेण्यात आली. त्यानुसार ‘इस्मा’ने चालू हंगामात शेतातील उसाचे क्षेत्र आणि साखरेच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात यंदा २० जानेवारीअखेर ५६८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ६०.८२ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. ‘इस्मा’च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात यंदा ९५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०७.२३ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ३८२ लाख टन उसाचे गाळप करून ४२ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे.
अन्य राज्यांतील स्थिती
कर्नाटकात यंदा ४२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. १५ जानेवारीअखेर कर्नाटकने २६.७६ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये ६२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.
इथेनॉलच्या उत्पादनातून साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. तसेच, इथेनॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्यामुळे सरकारलाही त्याचा निश्चितच फायदा होईल.
- रोहित पवार, अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
Web Title: Sugar production will fall by five lakh tonnes
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.