मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय कुटुंबातील कोणालाच पटला नव्हता. तसेच, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर दबाव येऊ लागल्याने अजित पवारांना निर्णय बदलावा लागल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, 'महिनाभरात काही गोष्टी आपोआप घडत गेल्या. सकाळी मला घरून फोन आल्यानंतरच कळाले की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला काहीही माहित नव्हते, मी झोपीत होतो. मला सकाळी सुप्रियाकडूनही याबाबत माहिती मिळाली. परंतु यानंतर मला खात्री होती की, राजकारणात मतभिन्नता असली तरी कुटुंब फुटणार नाही ही माझी खात्री होती असेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही. मी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं मत काय आहे, याची चिंता होती. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत मी बोलावं, अशी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची इच्छा होती, अशी माहितीही यावेळी शरद पवारांनी दिली.
काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला नेहमीच विरोध होता. मात्र सोनिया गांधींसोबत मी काही मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर थोडा विरोध होता. त्यावेळी मी सोनिया गांधी यांना काही घटना सांगितल्या. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, याची आठवण मी त्यांना प्रथम करुन दिली. आणीबाणीनंतर झालेल्या राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊन एकही उमेदवार उभा न करण्याची महत्त्वाची भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांनी काँग्रेससाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्याचं मी त्यांना सातत्याने सांगितलं, असं शरद पवारांनी सांगितलं.
Web Title: Sharad pawar clarifies about Ajit Pawar on he takes oath as dy CM
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.