फडणवीसांच्या भारूडाला मुख्यमंत्र्यांचं अभंगाने प्रत्युत्तर...

फडणवीसांच्या भारूडाला मुख्यमंत्र्यांचं अभंगाने प्रत्युत्तर...

नागपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी बुधवारी (ता. 18) विधिमंडळात केलेल्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उत्तर दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारूड सादर करून सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या भारूडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाने उत्तर दिले. 

सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामाना बघायला मिळत आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, चौथा दिवस यात विशेष ठरला. राज्यापालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोध बाकावरील सदस्यांनी राज्य सरकारवर अनेक प्रकारचे आरोप केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारूड सादर करून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. तोच धागा पकडत गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाचा वापर करून उत्तर दिले. 

ते म्हणाले, "अच्छे दिन येईचि ना..., नागरिकांच्या खात्यात 25 लाख जमा होईचि ना..., देशातील बेकारी कमी होईचि ना..., नोटबंदीनंतरचे 50 दिवस संपेचि ना...' मुख्यमंत्र्यांनी या अंदाजात दिलेल्या उत्तराने सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशातील हिंदूंना न्याय देण्यात केंद्र सरकार भेदभाव करीत आहे. सावरकरांबद्दल बोलण्याआधी भाजपने त्यांचे विचार समजून घ्यायला हवे. केंद्र सरकार एकीकडे गोवंश हत्याबंदी कायदा करते, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील लोक सदर कायद्याविरोधात वागतात. यावेळी त्यांनी किरण रिजिजू व मनोहर पर्रिकर यांचे नावही घेतले. 

बुलेट ट्रेन नाही तर तीनचाकी गरिबांच्या आवाक्‍यात
देवेंद्र फडणवीस यांनी हे तीनचाकी सरकार असून, राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेले सरकार असल्याची टीका बुधवारी सभागृहात केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचे सरकार गोरगरिबांचे असून, आम्ही भूमिपुत्रांसाठी काम करणार आहोत. त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील आहोत. गोरगरिबांना केवळ तीनचाकी रिक्षाच परवडते, बुलेट ट्रेन त्यांच्या आवाक्‍यात येत नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

आमचे सरकार बोलण्याऐवजी कृती करणारे
राज्यपालांनी केले अभिभाषण लहान निश्‍चितच आहे. मात्र, आमचे सरकार कमी बोलणारे असून, कृतीवर भर देणारे आहे. हे स्थगितीचे नाही तर प्रगतीचे सरकार आहे. स्थगितीच्या जीआरमध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत द्या, अशी घोषणाबाजी करीत सभात्याग केला. 

Web Title: uddhav thakrey reply on governor's speech at winter session nagpur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com