मुंबई : जर आमच्या सारख्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली गेली असती तर भाजपच्या पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या, असा टोला भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. मला डावलण्याचे कारण काय होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विधानभवनात पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान केले. ते म्हणाले, ''आमच्यासारख्या अनेक नेत्यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रात रुजवण्याचे व वाढवण्याचे काम केले. जेव्हा लोक दगड व शेण मारत होते तेव्हा आम्ही भाजपसाठी लढत होतो. माझ्या सारख्याने चाळीस वर्षे पक्षाची सेवा केली आहे,'' मला डावलण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी व्यथित होऊन विचारला
''ज्यांनी ज्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचे काम करण्यात आले. सर्वांनाघेऊन लढले असते तर तर पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या. मी, विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रशेखर बावनकुळे अशांना तिकीट दिले नाही हे ठीक आहे. पण आम्हाला विश्वासात घेतले असते तर जागा नक्कीच वाढल्या असत्या.'' असेही ते म्हणाले.
सिंचन घोटाळ्याच्या काही फाईल्स बंद केल्या आहेत. त्यावरही खडसेंनी टीका केली. आम्ही सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीवर पुरावे दिले होते. सिंचन घोटाळ्याचे ते सर्व पुरावे रद्दीत विकले, असे सांगत तेव्हा रद्दीचा भावही जास्त होता असा टोलाही त्यांनी मारला.
Web title : Eknath Khade criticize His Own Party BJP
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.