मुख्यमंत्रिपदाचा पेच कसा सुटणार?

मुख्यमंत्रिपदाचा पेच कसा सुटणार?

मुंबई : महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व पेच निर्माण झालाय. निवडणुकीतपूर्वीच झालेल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद उफाळून आलाय. आता हा वाद मिटणार का? कसा मिटणार? मिटला नाही तर, त्याचे काय परिणाम होणार यावर नजर टाकणे महत्त्वाचे आहे.

काय घडेल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ शनिवार (ता. 9) ला सायंकाळी साडेपाच वाजता संपेल. काळजीवाहू सरकार म्हणून ते कार्यरत राहील की नाही याबाबत साशंकता आहे. राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतील. भाजपकडे बहुमताचा 145 आकडा सोबत असेल तरच नव्या सरकारचा शपथविधी होईल. या सरकारला विधानसभेत बहुमत सिध्द करण्याचा आदेश राज्यपाल देतील. बहुमत सिध्द झाले नाही तर इतर जो पक्ष दावा करेल, त्यांना सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल संधी देतील व त्यांनाही विधानसभेत बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला जाईल.


अडचण काय?
भाजपला शिवसेनेची साथ मिळाली नाही आणि बहुमताचा आकडा गाठणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट झाले तर भाजप राज्यपालांचे सत्तास्थापनेचे निमंत्रण स्विकारण्याची शक्यता कमी आहे. कर्नाटकमध्ये येडीयुराप्पा सरकारला अशाच प्रकारे राजीनामा द्‌यावा लागल्याने महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता धूसर आहे.

पर्याय काय?
भाजपचे सरकार स्थापन न झाल्यास राज्यपाल इतर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करायचे की नाही याचा निर्णय घेतील. शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र जोडून सत्ता स्थापनेची संधी राज्यपालांकडे मागितली तर ती त्यांना द्‌यावीच लागेल, असे मानले जाते. या नव्या सत्तासमिकरणाने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला तरी त्यांना विधानसभेत बहुमत सिध्द करावेच लागेल.

सरकार स्थापनच न झाल्यास...?
राज्यात सत्ता स्थापन झाली नाही तर मग मात्र राज्यपाल विधानसभा काही काळासाठी संस्थगित ठेवतील आणि राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारला करतील. प्रत्यक्ष राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येते.

राजकीय परिणाम काय होतील?
घटनात्मक प्रक्रिया वरील पध्दतीने होणार असली तरी राजकीय प्रक्रिया कोणत्याही निर्णयाकडे जावू शकते. राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष असतानाही भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले तर इतर कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही यासाठी भाजप जरूर प्रयत्न करेल. भाजप नाही तर मग कोणीच नाही असे आक्रमक राजकारण राज्यात सुरू होईल. 


Web Title: sanjay miskin writes blog about maharashtra political situation bjp shiv sena
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com