शेतकरीच झाला ग्राहक

शेतकरीच झाला ग्राहक

औरंगाबाद - सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तऱ्हेतऱ्हेचे दिवस पाहायला मिळाले. सध्या खाण्यासाठी ठेवलेले धान्य व जनावरांचा चाराही संपला. त्यामुळे धान्य आणि चाऱ्यासाठी ऊस विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खुलताबाद तालुक्‍यातील भडजी शिवारातील ज्येष्ठ शेतकरी भानुदास वाकळे यांनी हे भयाण वास्तव मांडले.

भडजीजवळ कोरडेठाक पडलेले तीन तलाव, चारा आणि पाण्याअभावी जनावरांचे होणारे हाल, अडचणीत आलेला शेतकरी आदींबाबत श्री. वाकळे आम्हाला सांगत होते. त्यांची तीन एकर शेती पाण्याअभावी पडून आहे. यंदा त्यांना गव्हाची पेरणीही करता आली नाही. परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदून पाण्याचा शोध घेत आहेत. श्री. वाकळे यांच्या विहिरीचे खोदकामही नुकतेच पूर्ण झाले असून बॅंकेचे अडीच लाखांचे कर्ज घेऊन ते बांधकाम करीत आहेत. गदाना शिवारातील आप्पाराव चव्हाण मक्‍याच्या चाऱ्याजवळ बसले होते. त्यांना तीन एकर शेती आहे. दोन एकरांत कपाशी व मक्‍याचे पीक होते; पण पाण्याअभावी ते वाळून गेले.

कामासाठी नाशिक जिल्ह्यात 
शेख बाबा हे येसगाव क्रमांक एकचे रहिवासी. दुष्काळामुळे त्यांना गावात काम नाही. त्यामुळे ते नाशिक जिल्ह्यात विहीर खोदायच्या कामासाठी गेले. त्यांचा दहा जणांचा ग्रुप हे काम करतो. कुटुंब मात्र गावातच आहे.

पाचशे रुपयांत टॅंकर
वडोद कान्होबा येथील तरुण शेतकरी सुभाष भांडे यांनी विहीर घेतली; पण तिला पाणी नाही. सध्या ते आडवा बोअर घेत आहेत. कुठून तरी पाणी लागेल, या आशेवर त्यांचे काम सुरू आहे. ते पाच हजार लिटर पाण्याचे टॅंकर पाचशे रुपयांना विकत घेतात. परिसरात चाराही विकत मिळत नाही.

Web Title: Drought Farmer Customer

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com