देशाची रुग्णसंख्या 5 लाखाच्या पार, वाचा आता पुढे परिस्थिती कशी असेल?

देशाची रुग्णसंख्या 5 लाखाच्या पार, वाचा आता पुढे परिस्थिती कशी असेल?

देशाची रुग्णसंख्या 5 लाखाच्या पार गेली आहे.  गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल  18 हजार 552 नव्या रुग्णांची भर पडलीये. तर 384 जणांचा मृत्यू झालाय. आता देशाची एकूण रुग्णसंख्या 5 लाख 8 हजारहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत 15 हजार 685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. महत्त्वाचं म्हणजे एक्टीव रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आतापर्य़ंत 2 लाख 95 हजारहून अधिक  रुग्ण बरे झालेत. तर 1 लाख 97 हजार 387 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यात शुक्रवारी सर्वाधिक 5  हजार 24 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर  175 करोना बाधिताचा मृत्यू झालाय. यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासातील आहेत तर 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यू दर 4.65 % आहे. दरम्यान काल 2 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी परतले, आतापर्यंत एकूण 79 हजार 815 जण करोनामुक्त झालेत. तर 65 हजार 829  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 52 हजार 865 वर पोहचलीय.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता 'अनलॉक'च असेल. असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो, असे आरोप खोडून काढत त्यांनी चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले. सध्या करोनाची वाढत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय नसून, मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवी मुंबईतल्या कंटेन्मेंट झोनमध्ये येत्या 29 तारखेपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे. शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर शिंदे यांनी ही निर्णय जाहीर केला. शिवाय या लॉकडाऊनच्या काळात घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंगही केलं जाणार आहे. 

घर कामगार, वाहन चालक आणि इतर श्रमिक वर्गाला अनेक सोसायट्यांकडून प्रवेशास प्रतिबंध करण्यात येतोय...याची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतलीय. या श्रमिक वर्गाला अशा प्रकारे प्रवेश बंदी करता येणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे आणि मनमानी नियम करु नये अशा स्पष्ट सूचनाही गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या या परिपत्रकामुळं काही गृहनिर्माण सोसायट्चांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com