विमानतळावर प्लास्टिक वापराल तर... 

विमानतळावर प्लास्टिक वापराल तर... 

राज्यात प्लास्टिक, थर्माकोल तत्सम वस्तूंचा वापर बंद व्हावा यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) बुधवारपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सर्व विमानसेवा कंपन्या, विमानतळ परिसरातील विविध रेस्तरां तसेच अन्य संबंधितांना याबाबत सूचना देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्लास्टिक तसेच थर्माकोल किंवा एकदा वापरण्यात येणाऱ्या 'कटलरी' श्रेणीतील वस्तूंचा वापर करणे आता टाळावे लागेल. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वस्तूंचा वापर केल्यास आता ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. आज, २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.

केंद्र सरकारने गांधी जयंतीनिमित्त पर्यावरणपूरक होण्याचा मानस व्यक्त केला आहे. देशाने त्या दिशेने प्रयत्न सुरू करावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यासाठीच मिआलने ही मोहीम हाती घेतली आहे.
२ ऑक्टोबरपासून विमानतळावर पीईटी श्रेणीतील २०० मिलीलिटरची पाण्याची बाटली, प्लास्टिक कॅरी बॅग्स आदी वापरता येणार नाही. तसा वापर कोणी करीत असल्यास पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार व तिसऱ्यांदा तीन महिने तुरुंगवासासह २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. विमानसेवा कंपन्यांनीही विमानात प्रवाशांना अशा प्रकारच्या पाण्याच्या बाटली देऊ नयेत किंवा टर्मिनल इमारत परिसरातील दुकानांनीही त्याची विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश मिआलकडून देण्यात आले आहेत.


Web Title 5000 rupees fine for using plastic at the mumbai airport
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com