Eknath Shinde Live Speech : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. यानिमित्त विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात अनेकांतची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाषण करत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांचा फोन आल्यावर उरात धडकी भरायची असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Maharashtra Political News)
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं. कधी-कधी ठाण्यातील नागरिकांच्या समस्या बाळासाहेबांच्या कानावर पडायच्या. त्यावेळी त्यांचा अचानक फोन यायचा, बाळासाहेबांचा फोन बघितल्यावर उरात धडकी भरायची, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
'बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख'
पुढे बोलताना, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता, अशी आठवण शिंदे यांनी काढली.
'ही जादू फक्त बाळासाहेबांचीच'
'एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचं काम केलं. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केलं. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे', असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पाकिस्तान फक्त बाळासाहेबांनाच घाबरायचा
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, पाकिस्तान कुणालाही घाबरत नव्हता, पण तो फक्त बाळासाहेबांना घाबरायचा. एवढं मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व असतानाही नागरिकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बाळासाहेब लक्ष द्यायचे, त्यामुळेच गेली 25 वर्षे ठाण्याची सत्ता ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.