सचिन कदम, रायगड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रीवर्धन येथील कार्यक्रमावरून शिंदे गट विरूद्ध अजित पवार गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. रेवस-करंजा पुलाच्या श्रेयवादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट असा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादारम्यान राष्ट्रवादीची ही सुरुवात असेल, तर त्याला आम्ही उत्तर देऊ, असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी अजित पवार गटाला दिला आहे. (Latest Marathi News)
'अजित पवार हे सरकारमध्ये येण्या आधीच रेवस-करंजा पुलाला मंजुरी मिळाली होती. आता अजित पवार सरकारमध्ये आले आहेत. रेवस-करंजा पुलाचा कार्यक्रम आम्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन करणार आहोत. त्यात अजित पवार गटाने श्रीवर्धनमधील कार्यक्रम त्यांनी एकतर्फी केला, असा थेट आरोप शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात शिंदे गट विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांनी 'खळा बैठका' घेत कोकण दौरा केला होता. या खळा बैठकांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत 'खळा बैठक' आणि जाहीर सभेच्या मुद्द्यावरून आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बोलण्याच्या शैलीवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची तुलना करीत बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही, असं म्हणत गोगावले यांनी टीका केली.
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमधील भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्वांनी युतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केला आहे. पक्ष वाढवा, याबाबत आमचं म्हणण नाही, पण आमच्या जागेवर दावा कराल, तर तुमच्या जागांवर आमचे लोक दावा करतील, असा इशारा गोगावले यांनी मित्र पक्षांना दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.