Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असल्याने आहारात ताज्या आणि स्वच्छ फळांचा समावेश करणं महत्त्वाचं ठरतं. योग्य फळांची निवड केल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. पावसाळ्यात कोणती फळं खाल्ली पाहिजेत.
सफरचंद हे पावसाळ्यात खाण्यासाठी सुरक्षित आणि पौष्टिक फळ मानलं जातं. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात. नियमित प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यासही मदत होते.
डाळिंबामध्ये लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हे फळ पावसाळ्यात संतुलित आहाराचा चांगला भाग ठरू शकतात.
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असतं जे अन्नाचे पचन सुधारण्यास मदत करतं. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. ही दोन्ही फळं पोटासाठी हलकी असून मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास फायदेशीर ठरतात.
पावसाळ्यात उपलब्ध होणारे जांभूळ आणि आलूबुखारा ही हंगामी फळं पोषक घटकांनी समृद्ध असतात. जांभळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतं तर प्लममध्ये फायबर आणि विविध जीवनसत्त्वं असतात.
बाजारात आधीच कापून ठेवलेली फळं जास्त वेळ उघडी राहिल्यामुळे त्यावर जंतू वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी फळं खाण्यापेक्षा घरी ताजी फळं धुऊन स्वतः कापून खाणं अधिक सुरक्षित मानलं जातं. यामुळे अन्नातून होणाऱ्या इन्फेक्शनचा धोका कमी होऊ शकतो.
फळं खाण्यापूर्वी ती स्वच्छ वाहत्या पाण्याखाली नीट धुणं आवश्यक आहे. यामुळे फळांच्या सालीवरील धूळ, माती आणि सूक्ष्मजंतू कमी होण्यास मदत होते. सडलेली, खराब झालेली किंवा अतिपिकलेली फळं खाणं टाळावं.