Surabhi Jayashree Jagdish
चाणक्य नीती मानवी स्वभाव, वर्तन आणि जीवनातील तत्त्वांवर आधारित असल्याने लोकांचा आदर कधी आणि कसा मिळतो याबद्दल त्यात स्पष्ट सांगितले आहे. चांगल्या गुणांमुळे आणि प्रामाणिक वर्तनामुळेच समाजात मान-सन्मान मिळतो, असा चाणक्यांचा ठाम विश्वास होता.
व्यक्तीचा आदर त्याच्या शब्दांमुळे नव्हे, तर त्यातून दिसणाऱ्या कृती, बुद्धी आणि चारित्र्यामुळे मिळतो. खाली दिलेल्या गोष्टींच्या आधारे एखाद्याला आदर का मिळतो हे चाणक्यनीती स्पष्ट करते.
चाणक्यानुसार प्रामाणिक व्यक्तीवर लोक सहज विश्वास ठेवतात. खोटेपणा आणि ढोंग करणाऱ्याचा आदर केवळ वरवरचा राहतो. पण खरं बोलणारा आणि दिलेलं वचन पाळणाऱ्याचा सन्मान सर्वत्र होतो.
ज्याच्याकडे ज्ञान आहे, विवेक आहे आणि परिस्थिती समजून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तीला लोक मार्गदर्शक मानतात. चाणक्य म्हणतात, बुद्धीमंत व्यक्तीचा मान आपोआप वाढतो. अशा लोकांचे मत समाजात महत्त्वाचे ठरते.
अहंकार नसलेले आणि नम्रपणे वागणारे लोक सर्वांना आवडतात. मोठे यश मिळाल्यानंतरही शांत वृत्ती न सोडणाऱ्याचा आदर अधिक होतो. संयम टिकवणं हा चाणक्यांनी मोठा गुणधर्म मानला आहे.
वेळेचे भान असलेले, काम वेळेवर करणारे आणि आपला शब्द पाळणारे लोक विश्वासार्ह बनतात. चाणक्य सांगतात, शिस्त आणि वेळपालन हे प्रतिष्ठेचे मुख्य स्तंभ आहेत.
कठीण प्रसंगी साथ देणारी आणि कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करणारी व्यक्ती लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवते. चांगुलपणा आणि सेवाभाव हे चाणक्यांनी सर्वश्रेष्ठ गुण मानले आहेत.