Surabhi Jayashree Jagdish
जगभरात आणि भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसतेय. भारतात कोट्यवधी लोक मधुमेहाने ग्रस्त असून देशाला 'डायबेटीस कॅपिटल' असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे आता हा आजार फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो.
आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली असून जास्त वेळ बसून काम करण्याची सवय वाढलीये. फास्ट फूड, साखरयुक्त पेयं आणि जास्त कॅलरीयुक्त आहारामुळे वजन वाढतं आणि इन्सुलिनचा परिणाम कमी होतो.
कौटुंबिक इतिहास असल्यास मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. लठ्ठपणा, विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी यामुळे मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि व्यायामाचा अभाव यामुळेही मधुमेहाचा धोका वाढतो.
मधुमेहाची सर्व औषधं एकाच वेळी किंवा एकाच पद्धतीने घेतली जात नाहीत. काही गोळ्या नाश्त्यापूर्वी, काही जेवणानंतर तर काही रात्री झोपण्यापूर्वी घ्याव्या लागतात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसारच औषध घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मेटफॉर्मिनसारखी काही औषधं अनेकदा सकाळच्या किंवा जेवणासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होतं आणि पोटाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. सकाळी औषध घेतल्याने दिवसभरातील रक्तातील साखरेतील चढ-उतार नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
काही औषधं किंवा दीर्घकालीन प्रभाव असलेलं इन्सुलिन डॉक्टर रात्री घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून रात्री आणि सकाळच्या उपाशीपोटी साखरेवर नियंत्रण राहतं. काही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीनुसार रात्री औषध घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
मधुमेहाची औषधं नियमित आणि ठरलेल्या वेळी घेणं उपचारांचा महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचा डोस कमी-जास्त करणं किंवा औषध बंद करणं धोकादायक ठरू शकते.
ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.