Surabhi Jayashree Jagdish
काळं मीठ हे नैसर्गिक खनिज मीठ असून त्यामध्ये सल्फरयुक्त संयुगं आढळतात. त्यामुळे त्याला वेगळा वास आणि खास चव मिळते. चाट, फळं आणि रायता यांसारख्या पदार्थांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
काळं मीठ हे नेहमी काळ्या रंगाचेच असतं असे नाही. ते गुलाबी, जांभळट किंवा गडद तपकिरी रंगाचंही दिसू शकतं. सैंधव मीठ साधारणपणे पांढऱ्या किंवा फिकट गुलाबी रंगाचं असतं.
काळ्या मिठामध्ये सल्फरयुक्त संयुगं असल्यामुळे त्याला उकडलेल्या अंड्यासारखा विशिष्ट वास येतो. सैंधव मीठाला तीव्र वास नसतो. त्याची चव सौम्य, नैसर्गिक आणि संतुलित असते. त्यामुळे विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये ते सहज वापरले जाते.
काळं मीठ प्रामुख्याने चाट, रायता, सॅलड, फळं आणि पचनास मदत करणाऱ्या पेयांमध्ये वापरलं जातं. सैंधव मीठ उपवासाच्या पदार्थांमध्ये सर्वाधिक वापरलं जातं. याशिवाय भाजी, आमटी, सूप आणि इतर दैनंदिन पदार्थांमध्येही त्याचा उपयोग होतो.
काळं मीठ आणि सैंधव मीठ या दोन्हीमध्ये सोडियम असतं. त्यामुळे कोणतंही मीठ जास्त प्रमाणात खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. सैंधव मीठाला अनेकदा आरोग्यदायी पर्याय मानलं जातं. मात्र त्यामध्येही सोडियमचं प्रमाण असतं.
कोणत्याही प्रकारच्या मिठाचं अतिसेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहारासोबत मर्यादित प्रमाणात मीठ घेणे गरजेचे आहे.
कोणतं मीठ वापरायचे हे प्रामुख्याने पदार्थाचा प्रकार आणि अपेक्षित चव यावर अवलंबून असते. चाट, फळं किंवा रायत्यासाठी काळं मीठ अधिक योग्य मानले जाते. उपवासाचे पदार्थ आणि दैनंदिन स्वयंपाकासाठी सैंधव मीठाचा वापर अधिक केला जातो.