Surabhi Jayashree Jagdish
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा हायव्होल्टेज सामना ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. तर टीम इंडियाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठलीये. त्यामुळे आता ट्रॉफीसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
मात्र या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर विजेता कोण ठरणार? या संदर्भात ICC ने स्पष्ट नियम ठरवले आहेत.
आयसीसीने फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. जर ८ मार्च रोजी पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही किंवा पूर्ण होऊ शकला नाही, तर तो ९ मार्च रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल.
अंतिम सामन्यासाठी आयसीसीने १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवला आहे. म्हणजेच हवामानामुळे उशीर झाला तरी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामन्याचा निकाल लागू शकण्यासाठी किमान १० ओव्हर्सचा खेळ होणं आवश्यक आहे.
जर पावसामुळे उद्या आणि राखीव दिवशीही सामना खेळवता आला नाही तर आयसीसीच्या नियमांनुसार, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्सना संयुक्त विजेते घोषित केलं जाईल. म्हणजेच ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये वाटली जाईल.
यापूर्वी २००३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता आणि भारत व श्रीलंका या दोन्ही टीम्सना विजेते घोषित करण्यात आलं होतं.