Surabhi Jayashree Jagdish
मानवी शरीरामध्ये सुमारे 60 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. शरीर व्यवस्थित कार्य करण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ऑक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही शरीराला रोज गरज असते.
एका व्यक्तीने दिवसभरात साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालतात.
सध्या फिटनेसच्या नावाखाली अनेक लोक जास्त पाणी पिण्यावर भर देतात. पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागतं. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘हायपोनेट्रेमिया’ असं म्हटलं जातं. ही समस्या गंभीर आरोग्य धोक्यांना कारणीभूत ठरू शकते.
शरीरात सोडियम कमी झाल्यास अनेक त्रास जाणवू लागतात. अंगदुखी, सूज येणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. तसेच वारंवार लघवीला जाण्याचाही त्रास होऊ शकतो.
गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर अतिरिक्त ताण येतो. शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. विशेषतः किडनीच्या रुग्णांसाठी ही सवय धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे पाणी पिताना नेहमी शरीराची गरज लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हवामान, शारीरिक हालचाल आणि तहान यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवावं.