Shreya Maskar
पावसाळा सुरू होताच पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. यात जुलाब, अतिसार, पोटदुखी, संसर्ग, गॅस, ॲसिडिटी यांचा समावेश असतो. या समस्या उद्भवू नये म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
पावसाचे पाणी गटार आणि सांडपाण्यात मिसळते, जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित करते. अशा पाण्यात जीवाणू, विषाणू वाढतात. जे पोटात गेल्यास अतिसार, कॉलरा, टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गासारखे आजार होऊ शकतात. म्हणून विशेषता पावसाळ्यात उकळलेले, गाळलेले पाणी प्या.
पावसाळ्यात स्ट्रीट फूड आणि उघडे ठेवलेले अन्न खाणे टाळा, हे पदार्थ ओलावा आणि घाणीमुळे लवकर खराब होऊ शकते. माश्या आणि धूळ अन्नाला दूषित करतात, ज्यामुळे हानिकारक जीवाणूंची वाढ होते. या अन्नामुळे विषबाधा, उलट्या, अतिसार, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या भाज्या, मांस, अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्यातील जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि पोटात पोहोचल्यावर गंभीर संसर्ग होऊ शकतो. फळे आणि भाज्या पूर्णपणे धुऊनच खाव्यात.
पावसाळ्यात ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना पटकन पोटाचे विकार उद्भवतात. कमकुवत प्रतिकारशक्ती जीवाणू आणि विषाणूंशी प्रभावीपणे लढू शकत नाही, ज्यामुळे संसर्ग वेगाने पसरतो. संतुलित आहार, पुरेसे पाणी, चांगली झोप आणि नियमित व्यायाम प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
पावसाळ्यात स्वतःला स्वच्छ ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवा. गरम पाण्याने आंघोळ करा. जेवण्यापूर्वी किंवा स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात न धुतल्यास खराब जीवाणू आणि विषाणूं थेट तोंडात पसरू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.