Surabhi Jayashree Jagdish
सकाळची वेळ ही केवळ दिवसाची सुरुवात नसून हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाची असते. तज्ज्ञांच्या मते उठल्यानंतरच्या काही चुकीच्या सवयींमुळे रक्तदाब आणि तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढू शकते. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
झोपेत अनेक तास पाणी न मिळाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. अशा वेळी रक्त अधिक घट्ट होतं आणि ते शरीरभर पोहोचवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात.
सकाळी शरीर पूर्णपणे एक्टिव्ह होण्यापूर्वीच कठीण व्यायाम सुरू केल्यास हृदयावर अचानक ताण येऊ शकतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव निर्माण होऊन रक्तदाबात अनियमित बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही व्यायामापूर्वी हलका वॉर्म-अप करणं आवश्यक असतं.
वॉर्म-अपमुळे हृदयाचे ठोके हळूहळू वाढतात आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि हृदयाला विश्रांतीच्या अवस्थेतून एक्टि्वह अवस्थेत जाण्यास मदत होते. वॉर्म-अप टाळल्यास अचानक होणारा शारीरिक ताण हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो.
सकाळच्या नाश्त्यात जास्त मीठ, प्रोसेस पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. अशा पदार्थांमुळे हृदयावर दीर्घकाळ अतिरिक्त ताण निर्माण होण्याचा धोका असतो. संशोधनानुसार, सकाळी रक्तदाब वाढण्याच्या काळात अशा प्रकारचा नाश्ता हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सकाळी नियमितपणे रक्तदाब तपासणं महत्त्वाचं आहे. अनेकदा सकाळच्या वेळेत रक्तदाबाची पातळी सर्वाधिक वाढलेली आढळते. नियमित तपासणी न केल्यास सुरुवातीची धोक्याची लक्षणं लक्षात येत नाहीत.
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा वेळेअभावी नाश्ता करत नाहीत परंतु ही सवय हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. नाश्ता टाळल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.