Surabhi Jayashree Jagdish
भारतात कॅन्सरच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य तज्ज्ञांनी आता आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील काही वस्तूंविषयी गंभीर इशारा दिलाय. प्लास्टिकचे डबे, प्रोसेस्ड फूड, नॉन-स्टिक भांडी यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट्सनुसार, भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०२६ पर्यंत देशात दरवर्षी १५ लाखांहून अधिक नवीन कॅन्सर रुग्ण आढळू शकतात. जीवनशैली, चुकीचा आहार आणि आनुवंशिक कारणांसोबतच घरातील काही वस्तू देखील या धोक्याला कारणीभूत ठरतात.
प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ आपण रोज खातो. पॅकेटमधील स्नॅक्स, चिप्स, फास्ट फूड किंवा डीप फ्राय केलेले पदार्थ यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स असतात. यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरात गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
स्वयंपाकघरात वापरला जाणारा साधा भांडी घासण्याचा स्पंज देखील धोकादायक ठरू शकतो. या स्पंजमध्ये डोळ्यांना न दिसणारे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. हे जंतू भांड्यांमार्फत शरीरात जाऊन रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.
जास्त साखर असलेले पदार्थ आणि पेय यांचंही प्रमाणात सेवन करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेल्या पदार्थांमुळे मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. यामुळे पुढे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
स्वयंपाकघरात प्लास्टिकच्या डब्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गरम अन्न प्लास्टिकमध्ये ठेवणं किंवा त्यात अन्न गरम करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. प्लास्टिकमधील हानिकारक रसायनं आणि मायक्रोप्लास्टिक अन्नात मिसळून शरीरात जाऊ शकतात.
अनेकजण फूड पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. पण खूप आंबट किंवा जास्त खारट पदार्थ फॉइलमध्ये ठेवल्यास धातूचे सूक्ष्म कण अन्नात मिसळू शकतात. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो