Surabhi Jayashree Jagdish
पावसाळा सुरू झाला की पायांना फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. सततचा ओलावा, घाम आणि पायांची अपुरी स्वच्छता यामुळे बुरशी वेगाने वाढतं. त्यामुळे खाज, लालसरपणा, दुर्गंधी, त्वचा सोलून निघणं आणि जळजळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे पाय सतत ओले किंवा दमट राहतात. अशा ओलसर वातावरणात बुरशीची वाढ वेगाने होते आणि त्वचेवर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. विशेषतः पायाची बोटं, नखांच्या आजूबाजूचा भाग आणि तळपाय याठिकाणी फंगल इन्फेक्शन सहज पसरू शकतं.
बाथरूम, अंगण किंवा घरातील ओल्या जागेत अनवाणी फिरल्यामुळे पायांचा थेट संपर्क बुरशी आणि जंतूंशी येतो. त्यामुळे त्वचेवर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा ठिकाणी नेहमी रबरच्या चप्पलांचा वापर करणं अधिक सुरक्षित मानलं जातं.
पावसाळ्यात लेदरचे शूज पाणी आणि ओलावा सहज शोषून घेतात. त्यामध्ये हवा कमी असल्यामुळे पाय बराच वेळ दमट राहतात आणि बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे या दिवसांत वॉटर-रेझिस्टंट किंवा लवकर सुकणारे फुटवेअर वापरावेत.
मोजे घालण्यापूर्वी पाय पूर्णपणे कोरडे न केल्यास बोटांच्या मध्ये ओलावा राहतो. हा ओलावा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढवतो. त्यामुळे मोजे घालण्यापूर्वी टॉवेलने पाय, विशेषतः बोटांमधील भाग व्यवस्थित पुसून कोरडा करावा.
ओले किंवा घामाने भिजलेले मोजे बराच वेळ वापरल्याने पायांमध्ये सतत ओलावा राहतो. घट्ट मोज्यांमुळे हवेशीरपणा कमी होतो आणि बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्वच्छ, कोरडे आणि घाम शोषणारे मोजे नियमित बदलणं आवश्यक आहे.
पावसात बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुणं आणि कोरडं करणं अनेकजण टाळतात. त्यामुळे चिखल, घाण आणि जंतू त्वचेवर राहून संसर्गाचा धोका वाढतो. दिवसातून किमान एकदा पाय स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे ठेवण्याची सवय लावावी.