ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो राजकीय सार्वभौमत्व आणि वैभवाचे प्रदर्शन करणारा एक भव्य प्रसंग होता.
या सोहळ्यासाठी महाराजांचा पोशाखही साजेसा आणि अत्यंत दैदीप्यमान होता, अशा ऐतिहासिक नोंदी सापडतात.
राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पवित्र स्नानानंतर महाराजांनी विशेष वस्त्रं परिधान केली होती.
सुरुवातीच्या धार्मिक विधींसाठी त्यांनी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं. त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाच्या विधीसाठी त्यांनी भगव्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. केशरी रंग हा शौर्य, त्याग आणि हिंदुत्वाचे प्रतीक मानला जातो.
ऐतिहासिक नोंदीप्रमाणे या पोशाखावर सोन्याची आकर्षक नक्षी केलेली होती. ज्यामुळे त्याची भव्यता अधिक वाढत होती.
महाराजांच्या मस्तकावर मोत्यांच्या माळांनी सुशोभित केलेला एक भव्य राजमुकुट होता. हा मुकुट रत्नजडित असावा, अशीही काही वर्णनं आढळतात.
काही चित्रणांमध्ये महाराजांना सोनेरी पगडी आणि त्यावर हिरेजडित शिरपेच आणि तुरा असंही दाखवलं जातं.
या सोहळ्यासाठी महाराजांच्या गळ्यात हिरे-मोत्यांचे आलंकारिक हार होते. जे त्यांच्या राजेशाही थाटात भर घालत होते. याशिवाय हातात रत्नजडित कडे आणि इतर अलंकार होते.